कैलास पर्वतावर चढाई का बंद आहे?
जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हजारो गिर्यारोहकांनी सर केले आहे, पण कैलास पर्वतावर आजपर्यंत एकाही व्यक्तीला अधिकृतपणे चढाई करता आलेली नाही. यामागील धार्मिक, शासकीय आणि रहस्यमय कारणांचा आढावा.

कैलास पर्वत रहस्य
जगभरातील उंच पर्वतांचा विषय निघाला की आपल्या डोळ्यांसमोर दोन पर्वत येतात.
एक म्हणजे जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट आणि दुसरा कैलास पर्वत.
पण आपल्या मनामध्ये प्रश्न पडतो की, आतापर्यंत माउंट एव्हरेस्ट सर केलेल्या अनेक
बातम्या आपल्या वाचनात येतात, पण आतापर्यंत एकाही व्यक्तीने कैलास पर्वत सर का केला नाही?
का चीन सरकारने या पर्वतावर जाण्यासाठी मनाई केली आहे? यामागची सविस्तर कारणे जाणून घेऊया.
गिर्यारोहणाचा आणि पर्वतांचा विषय निघाल्याबरोबर आपल्या डोळ्यांसमोर माउंट एव्हरेस्ट आणि कैलास पर्वत हे दोन्ही पर्वत
येतात. पण प्रश्न हा पडतो की, माउंट एव्हरेस्टपेक्षाही कमी उंचीचा असलेल्या कैलास पर्वतावर अद्याप कोणीही चढाई का करू
शकला नाही? यामागे काय कारण आहे? शासकीय की अध्यात्मिक? या दोन्ही गोष्टी आपण समजून घेऊया.

माउंट एव्हरेस्ट
माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे. बर्फाने आच्छादलेला असल्यामुळे या पर्वतावर चढाई करणे अत्यंत
अवघड असते आणि जसे जसे आपण वर जातो, तसे तसे ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी होत जाते. अनेक गिर्यारोहक
या मोहिमेदरम्यान आपला जीव गमावून बसले आहेत. त्यांचे मृतदेह देखील त्या पर्वतावरून खाली आणता आलेले नाहीत.
माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या अनेक गिर्यारोहकांनी सांगितले आहे की, या प्रवासादरम्यान
अनेक मृतदेह तिथे पडलेले होते आणि ते त्याच अवस्थेत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर असून त्याची अधिकृत उंची 8,848.86 मीटर (29,031.7 फूट) आहे.
हेही वाचा-उबाठा गटाला आणखी एक धक्का?
ही उंची 2020 मध्ये नेपाळ आणि चीन यांनी संयुक्तपणे जाहीर केली. माउंट एव्हरेस्ट हिमालय पर्वतरांगेत
स्थित असून तो नेपाळ आणि चीन (तिबेट स्वायत्त प्रदेश) यांच्या सीमेवर आहे. त्यामुळे
एव्हरेस्ट कोणत्याही एका देशाचा नसून दोन्ही देशांच्या सीमारेषेवर वसलेला आहे.
एव्हरेस्टवर प्रथम यशस्वी चढाई 29 मे 1953 रोजी न्यूझीलंडचे गिर्यारोहक एडमंड हिलरी आणि नेपाळचे शेर्पा तेनसिंग नोर्गे
यांनी केली होती. त्यानंतर हे शिखर जगभरातील गिर्यारोहकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले.
आजपर्यंत हजारो गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, 2025 पर्यंत सुमारे 7,000 हून अधिक
व्यक्तींनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली असून एकूण यशस्वी चढायांची संख्या 13,000 पेक्षा अधिक आहे. काही
गिर्यारोहकांनी हे शिखर अनेक वेळा सर केले आहे. तथापि, अत्यंत प्रतिकूल हवामान, कमी ऑक्सिजन आणि
हिमस्खलनाचा धोका यामुळे एव्हरेस्ट चढाई अजूनही जगातील सर्वात आव्हानात्मक मोहिमांपैकी एक मानली जाते. त्यामुळे
एव्हरेस्ट हे केवळ उंचीचे प्रतीक नसून मानवी धैर्य, चिकाटी आणि साहसाचेही प्रतीक आहे.

कैलास पर्वत
कैलास पर्वत हा जगातील सर्वात पवित्र आणि रहस्यमय पर्वतांपैकी एक मानला जातो. हा पर्वत तिबेटमधील (चीनच्या
तिबेट स्वायत्त प्रदेशात) ट्रान्स-हिमालय पर्वतरांगेत स्थित आहे. कैलास पर्वताची उंची सुमारे 6,638 मीटर (21,778 फूट) आहे.
उंचीच्या दृष्टीने तो हिमालयातील सर्वात उंच शिखर नसला तरी धार्मिक
आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे त्याला विशेष स्थान प्राप्त झाले आहे.
हिंदू धर्मानुसार कैलास पर्वत हे भगवान शिव आणि माता पार्वती यांचे निवासस्थान मानले जाते.
बौद्ध, जैन आणि बोन या धर्मांमध्येही या पर्वताला अत्यंत पवित्र मानले जाते.
जैन धर्मातील पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांना येथे मोक्ष प्राप्त झाल्याची श्रद्धा आहे.
त्यामुळे दरवर्षी हजारो भाविक कैलास-मानसरोवर यात्रेसाठी येथे येतात.
विशेष बाब म्हणजे आजपर्यंत कैलास पर्वतावर कोणालाही अधिकृतरीत्या चढाई करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
चीन सरकारने या पर्वतावर गिर्यारोहण करण्यास बंदी घातली आहे.
यामागील प्रमुख कारण म्हणजे या पर्वताचे धार्मिक महत्त्व. जगभरातील कोट्यवधी हिंदू,
बौद्ध, जैन आणि बोन धर्मीयांसाठी हे श्रद्धास्थान असल्याने त्याच्या
पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी ही मनाई करण्यात आली आहे.
1990 च्या दशकात काही गिर्यारोहकांनी कैलास पर्वतावर चढाई करण्याची इच्छा व्यक्त केली होती,
परंतु धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची शक्यता लक्षात घेऊन चीन सरकारने परवानगी नाकारली.
अनेक धार्मिक नेत्यांनीही या निर्णयाचे समर्थन केले. त्यामुळे आजही कैलास पर्वत हा जगातील काही मोजक्या प्रसिद्ध
शिखरांपैकी एक आहे, ज्यावर मानवाने अधिकृतरीत्या पाऊल ठेवलेले नाही. त्यामुळे कैलास
पर्वताचे गूढ, पावित्र्य आणि आकर्षण आजही कायम आहे.
तसेच, या पर्वताविषयी आणखी काही गोष्टी ऐकायला मिळतात. त्यामधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, काही गिर्यारोहकांनी पूर्वी
वर जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांचा हा प्रयत्न फसला. त्या गिर्यारोहकांनी सांगितले की, आम्ही जसे जसे वर जाऊ
लागलो तसे तसे आम्हाला खाली आल्याचा भास होऊ लागला आणि बरेच दिवस चढूनही आमच्या लक्षात आले की, आम्ही
जिथून सुरुवात केली होती तिथेच पुन्हा पोहोचलो आहोत. अशी माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे.
अनेक धर्मांच्या लोकांचे हे श्रद्धास्थान असल्यामुळेच या पर्वताला एक वेगळे आणि विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे







