राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र?
मातोश्रीवरील 40 मिनिटांच्या भेटीनंतर महाराष्ट्रात चर्चेला उधाण

- मातोश्रीवर ठाकरे बंधूंची 40 मिनिटांची गुप्त बैठक!
- तीन महिन्यांत पाच भेटी!
- “आम्ही एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठीच!” — या विधानानंतर चर्चा आणखी तापली.
- ठाकरे बंधूंची संभाव्य युती भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर 40 मिनिटे चाललेल्या बैठकीनंतर पुन्हा एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंच्या या सलोख्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणं निर्माण होऊ शकतात.
मातोश्रीवर ठाकरे बंधूंची 40 मिनिटांची गुप्त बैठक!
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज परत एकदा एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबत जवळपास 40 मिनिटे बंद दरवाजाआड चर्चा केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे.
हे हि वाचा-२ वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका – सरकारचा इशारा
महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. आता सर्वांचे लक्ष ठाकरे बंधूंकडे लागले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्र लढवणार का? असा प्रश्न सर्वत्र चर्चेत आहे. वारंवार या दोघांकडून युतीचे संकेत मिळत आहेत.
कालच्या दसऱ्याच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले की, “आम्ही एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठीच.” या संभाव्य युतीमुळे मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर मोठा परिणाम होऊ शकतो.
दसऱ्याच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य:
“आम्ही एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठीच!” — या विधानानंतर चर्चा आणखी तापली.

ठाकरे बंधूंच्या भेटींचा कालक्रम:
27 जुलै 2025: उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर गेले व शुभेच्छा दिल्या.
27 ऑगस्ट 2025: उद्धव ठाकरे व सौ. रश्मी ठाकरे यांनी शिवतीर्थ येथे जाऊन राज ठाकरे यांच्यासोबत गणेश दर्शन घेतले.
10 सप्टेंबर 2025: या दिवशी दोन्ही भावांची पुन्हा भेट झाली आणि सविस्तर चर्चा झाली.
5 ऑक्टोबर 2025: खासदार संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र दिसले. त्यानंतर राज ठाकरे मातोश्रीवर गेले आणि दोघांमध्ये 40 मिनिटांची चर्चा झाली.
हे हि वाचा-हृदयरोग टाळण्यासाठी आवश्यक माहिती: कारणे, लक्षणे, तपासण्या आणि उपचार
या तिन्ही महिन्यांत (ऑगस्ट ते ऑक्टोबर) ठाकरे बंधूंची पाच वेळा भेट झाल्याचे समोर आले आहे.
ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबई महानगरपालिकेत बदल?
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले, तर त्यांना निश्चितच फायदा होईल.
मतदारसंघाचे अंदाजे प्रमाण असे आहे:
मराठी मतदार: 35%
उत्तर भारतीय व मुस्लिम मतदार: 25-30%
गुजराती मतदार: 15%
इतर: 7-8%
मराठी मतदार हे निर्णायक मानले जातात. आत्तापर्यंत मराठी मतदारांनी शिवसेनेला साथ दिली आहे. मात्र, पक्ष फुटल्यानंतर ही पहिलीच महानगरपालिका निवडणूक आहे.
मागील निवडणुकीत:
शिवसेना: 84 जागा (28% मते)
भाजप: 82 जागा (27% मते)
मनसे: 8 जागा (8% मते)
जर या निवडणुकीत उद्धव ठाकरे गट आणि मनसे एकत्र आले, तर त्यांची एकत्रित मतांची टक्केवारी 36% पेक्षा जास्त होऊ शकते, ज्यामुळे त्यांना मोठा फायदा होईल.
सध्याच्या राजकीय परिस्थितीत ठाकरे बंधूंसमोर पर्याय मर्यादित आहेत. विधानसभेतील अपयश पाहता त्यांचं एकत्र येणं गरजेचं वाटतं. आता केवळ प्रश्न आहे — ही युती औपचारिकरित्या कधी जाहीर होणार?
तसेच महाविकास आघाडीतील इतर दोन घटक — शरद पवार गट आणि काँग्रेस — या संभाव्य युतीबद्दल काय मत व्यक्त करतात, हेही पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.







