DEVENDRA FADAVNIS-मराठवाड्यात पूरस्थिती गंभीर | दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत
मराठवाड्यात पूरस्थिती गंभीर | मुख्यमंत्री फडणवीसांची मदतीची ग्वाही

मराठवाड्यात पूरस्थिती भीषण; मुख्यमंत्री फडणवीसांचा लातूर दौरा, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात अतिवृष्टीचे थैमान सुरू असून अनेक नद्यांना पूर आल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने सामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (लातूर जिल्हा) दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला.

औसा तालुक्यातील उजनी येथे पाहणीदरम्यान बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “पूरामुळे शेतकरी व व्यापारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासन कोणतेही निकष न पाहता प्रत्येकाला संपूर्ण मदत करणार आहे. ही मदत दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल.” त्यांनी आठवण करून दिली की, सात वर्षांपूर्वी ते याच गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेचे काम पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी पाण्याची टंचाई होती; मात्र आता ढगफुटी सदृश्य पावसामुळे उलट परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की पूरामुळे फक्त शेतीच नाही तर घरगुती साहित्य, व्यापार, तसेच जिल्ह्याचे इन्फ्रास्ट्रक्चरही कोलमडले आहे. अनेक रस्ते, पूल वाहून गेले असून त्यांची पुनर्बांधणी युद्धपातळीवर केली जाणार आहे. यासाठी 2300 कोटी रुपयांचा पहिला हप्ता राज्य सरकारने मंजूर केला आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर वाढीव मदतही देण्यात येईल, अशी खात्री त्यांनी दिली.
विशेष म्हणजे, आता पंचनाम्यासाठी मोबाईलवर काढलेले फोटो, व्हिडिओ किंवा ड्रोनद्वारे घेतलेले फुटेज अधिकृतरीत्या ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे पंचनाम्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ होईल.
दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनाही मराठवाडा दौऱ्यात शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांनी त्यांना थेट प्रश्न विचारले, त्यामुळे वातावरण थोडे तणावपूर्ण झाले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी आश्वासन दिले की, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा केली जाईल. तसेच, ज्यांच्या जमिनी पुरामुळे पूर्णपणे वाहून गेल्या आहेत, त्यांना वेगळी व विशेष मदत देण्यात येईल.
हे हि वाचा-New GST-आनंदाची बातमी २. ५०लाख कोटी रुपये येणार सामान्य जनतेच्या खिश्यात?
संकट काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही पुढाकार घेतला
या संकट काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही पुढाकार घेतला आहे. अजित पवार गटाचे सर्व आमदार व खासदार आपला एका महिन्याचा पगार पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्याशिवाय राष्ट्रवादीचे सर्व मंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पूरस्थितीचा आढावा घेत आहेत. अजित पवार यांनीही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली.
राज्य शासनाने एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे मदत देण्यास सुरुवात केली असून केंद्र शासनाकडूनही अतिरिक्त निधी मिळण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान एवढे प्रचंड आहे की ते काही दिवसांत भरून निघणे अवघड आहे. अनेक जनावरे वाहून गेली, तर काही गावे संपूर्ण पाण्याखाली गेली आहेत.
हे हि वाचा-“अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार भरीव अनुदान : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा”
शेतकरी मात्र शासनाकडून तात्काळ व भरीव मदतीची अपेक्षा करीत आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांचा आक्रोश तीव्र होताना दिसत आहे. शासनाने केलेली घोषणा आता कितपत वेगाने अंमलात आणली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठवाड्यातील पूरस्थितीने शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले असले तरी शासन, विरोधी पक्ष आणि स्थानिक संस्था सर्वजण त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा झाली तर त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा दिलासा उमलण्याची आशा आहे.







