सोयाबीन दरात प्रचंड तफावत! जालना 6500 – नांदेड 3700; शेतकरी चिंतेत
आवक वाढली, पण दर मात्र स्थिर

- आवक वाढली, पण दर मात्र स्थिर
- जालना सर्वाधिक, मराठवाड्यात दर कमी का?
- वेगवेगळ्या बाजार समित्यांतील दरांची तुलना
- शेतकऱ्यांची चिंता – शासकीय खरेदी सुरु नाही
- भाव वाढतील या अपेक्षेने काहींचा थांबून विक्रीचा निर्णय
शेतकरी चिंतेत: सोयाबीन कुठे 3700 तर कुठे 6500
सोयाबीन दरात प्रचंड तफावत
राज्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक झालेली आहे, पण सोयाबीनचे दर मात्र अपेक्षेप्रमाणे वाढलेले नाहीत. शासकीय खरेदी केंद्रे देखील चालू नाहीत, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.सोयाबीन दरात प्रचंड तफावत पाहायला मिळत आहे

यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे उत्पन्न हे निम्म्यापेक्षाही कमी आले आहे. दोन ते तीन क्विंटलचा उतारा येत आहे, तरी बाजारामध्ये मात्र सोयाबीनचे दर वाढलेले नाहीत.
जेव्हा आवक घटते तेव्हा दर तेजीत येतात, हे बाजाराचे सूत्र असते. पण यंदा मात्र हे सूत्र अपवाद ठरत आहे. सोयाबीनचा उतारा घटलेला असताना दर मात्र जैसे थे आहेत.
राज्यात सोयाबीनच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या दरामध्ये कमालीची तफावत
दरवर्षी संपूर्ण राज्यामध्ये सोयाबीनच्या खरेदीचे दर हे एकसारखे पाहायला मिळतात. पण यावर्षी मात्र राज्यात विविध ठिकाणी सोयाबीनच्या दरामध्ये कमालीची तफावत पाहायला मिळत आहे. कुठे 3700 तर कुठे सहा हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळत आहे.
सोयाबीनवर संपूर्ण राज्यामध्ये प्रक्रिया एकाच प्रकारची होते, तर मग दरामध्ये एवढी तफावत कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये निराशाही येत आहे. म्हणजे जालना येथे 6500 दर तर नांदेडमध्ये 3700–4200 पर्यंतचा दर. कशामुळे?
कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर काय आहेत?
राज्यामध्ये अहमदनगर, नांदेड, परभणी, हिंगोली आदी ठिकाणी सोयाबीनला 3700 ते 4500 पर्यंतचा दर मिळत आहे. व याच मराठवाड्यातील दोन-तीन जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते;
त्या ठिकाणीच दर हे कमी असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी उतारा हा दोन ते तीन क्विंटलचाच आलेला आहे. त्यामुळे दरवाढीची अशी अपेक्षा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.
सर्वाधिक दर हे सध्या जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहेत. सहा नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबरच्या दरम्यान सोयाबीनला सरासरी दर हा 4150 ते 6500 पर्यंत पाहायला मिळाला.
या ठिकाणी आवक कमी झाल्यामुळे दर वाढले असल्याची माहिती प्रसारमाध्यमांमध्ये आली आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आवक कमी असूनदेखील दर कमीच मिळत आहेत.
विदर्भातील अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4000 ते 4700 एवढा दर मिळाला आहे. तर मराठवाड्यातील लातूरमध्ये 4950 एवढा दर मिळाला आहे, पण तेथेही सरासरी दर हा 4200 पर्यंतच असल्याचे बोलले जात आहे.
तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपयांचा दर मिळालेला आहे. कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला 3700 ते 4752 एवढा दर मिळाला आहे.
छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4200 ते 4350 एवढा सरासरी दर मिळालेला आहे.
हेही वाचा-बदलत्या हवामानाचा तुरीच्या पिकावर परिणाम
हे जीवाचा-रेकॉर्ड ब्रेक हरभरा उत्पादनासाठी योग्य लागवड पद्धत
दरांमध्ये असलेली तफावत आणि शासकीय खरेदी ही पूर्णपणे चालू नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राज्यातील इतर ठिकाणचे सोयाबीनचे भाव पाहता भाव पुढे चालून वाढतील, या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी सोयाबीन न विकण्याचा निर्णय घेतलेला आहे.
तर काही जणांनी “आपल्याला आधीच उत्पन्न कमी आलेले आहे, त्यामुळे नुकसान फार होणार नाही” या विचाराने सोयाबीन विक्रीला सुरुवात केलेली आहे. या दरांमधील आलेल्या तफावतीकडे राज्य सरकारने गांभीर्याने पाहावे, ही राज्यातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.







