पुढील 3 दिवस तापमानात आणखी घट; मराठवाडा–विदर्भात थंडीचा इशारा”
“राज्यात थंडीचा कडाका वाढला!

“थंडीचा कडाका महाराष्ट्र”
सध्या राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. किमान तापमानामध्ये घट झाली असून राज्यातील काही भागांमध्ये 8 ते 10 अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविले गेले आहे. राज्यात थंडी आणखी काही दिवस राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

संपूर्ण राज्यातच थंडीचा कडाका वाढला आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये पारा घसरला असून सर्वत्र थंडीची लाट आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात राज्यातील मराठवाडा, विदर्भ, कोकण, मुंबई आणि पुणे या विभागांमध्ये थंडी कायम राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हवामान संशोधन आणि सेवा पुणे कार्यालय यांनी दिलेली माहिती
https://www.imdpune.gov.in/marathi/weatherservicemarathi.php
मराठवाड्यामध्ये देखील थंडी वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील मागील काही दिवसांत थंडी वाढलेली आहे. तसेच 18 ते 21 नोव्हेंबर या काळात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तविली आहे.
थंडीचा कडाका वाढणार
रविवारचा दिवस खूपच थंड होता. या दिवशी धुळ्यामध्ये 8 अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविले गेले. तसेच मराठवाड्यातील परभणीमध्ये देखील थंडी वाढल्याचे पाहायला मिळाले असून येथे तापमान 10 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. मराठवाड्यात सर्वाधिक थंडीही परभणीमध्ये पडली आहे.
वाढत्या थंडीमुळे गरम व उबदार कपड्यांच्या बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी दिसत आहे. स्वेटर, मफलर, कानटोपी, कानपट्टी, हातमोजे, सॉक्स यांसारखे उबदार कपडे घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये शेकोट्यांभोवती गप्पांचे फड धुमसताना दिसत आहेत.
राज्यात जरी थंडी वाढलेली असली तरी राजकीय वातावरण मात्र नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमुळे चांगलेच तापले आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. उद्यापासून प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होईल. वाढत्या थंडीमध्ये राजकीय वातावरणही तापणार असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा-शेतकऱ्यांना मोठी संधी अमेरिकेची २५०+ अन्न उत्पादनांवरील करसूट
हेही वाचा-अंकुरित बटाटे खाणं धोकादायक का असतं?
राज्यामध्ये सर्वत्र थंडी असली तरी महाबळेश्वरची थंडी काही औरच. महाबळेश्वरला ‘मिनी कश्मीर’ असेही म्हटले जाते. येथे पर्यटकांची गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे तेथील स्थानिक व्यापारी देखील समाधानी आहेत. वाढलेल्या थंडीमुळे येथे काही दिवस बोचरी थंडी तसेच गुलाबी थंडीचा आनंद घेता येणार आहे.
शेतकरी देखील आनंदात आहेत. कारण रब्बी पिकांना हे थंड वातावरण पोषक असते. सध्या गहू व हरभरा यांच्या पेरणीचे काम काही ठिकाणी सुरू असून काही ठिकाणी पूर्ण झाले आहे.
गहू पिकासाठी थंडी आवश्यक असल्यामुळे सध्या पडणारी थंडी गहू पिकाला लाभदायक ठरणार असून उत्पादन चांगले येईल, अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत. अतिवृष्टीमुळे खरिपातील बहुतेक पिके वाया गेल्याने आता सर्व अपेक्षा रब्बी हंगामावर आहेत.
पुढील काही दिवस थंडी वाढणार असल्यामुळे आजारी असलेल्या नागरिकांनी आपल्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी.







