मुंबई महानगरपालिका निवडणूक : ठाकरे बंधूंना अपयश का आले? जाणून घ्या ५ प्रमुख कारणे
जाणून घ्या ५ प्रमुख कारणे ठाकरे बंधूंच्या अपयशाची

मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंचा करिष्मा चालणार का, याविषयी चर्चा होती. पण निकालानंतर स्पष्ट झाले की मुंबईच्या जनतेने ठाकरे बंधूंना नाकारले. नेमकी कोणती कारणे आहेत, ज्यामुळे ठाकरे बंधूंना अपयशाचा सामना करावा लागला, ते पाहूया.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राजकीय दृष्ट्या वेगळे झाले. राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केला. पहिल्याच निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांचे १३ आमदार निवडून आले.
पण त्यानंतर मात्र राज ठाकरे यांच्या पक्षाची पडझड सुरू झाली. अगदी दुसऱ्याच निवडणुकीत मनसेची संख्या एका आमदारावर आली. आता मात्र मनसेचा एकही आमदार विधानभवनामध्ये नाही.
दुसरीकडे एकनाथराव शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची देखील पीछेहाट झाली, कारण त्यांचे पक्ष आणि चिन्ह या दोन्ही गोष्टी एकनाथराव शिंदे यांना मिळाल्या. या दोन्ही ठाकरे बंधूंना आलेल्या अपयशानंतर हिंदी सक्तीच्या विरोधातील एका आंदोलनामध्ये हे दोघेही ठाकरे बंधू एकत्र आले. त्यानंतर त्यांनी महानगरपालिका निवडणूक एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला, पण त्यामध्ये देखील या दोघांना अपयश आले.
हे ही वाचा-षट्कर्म म्हणजे काय? नेतीसह षट्कर्मांचे प्रकार, फायदे व योग्य पद्धत
हे ही वाचा-भविष्यात हृदयरोग टाळायचा असेल तर या तपासण्या वेळेवर करा
१) युती जाहीर करण्यासाठी बराच वेळ घालविला
यातील पहिले कारण म्हणजे जुलै महिन्यामध्ये वरळी डोम येथे हे दोन्ही ठाकरे बंधू हिंदी सक्तीच्या जीआरला विरोध करण्यासाठी एकत्र आले. त्यानंतर त्यांच्या अनेक भेटी झाल्या, पण युतीबाबत दोघांनीही कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. अगदी महानगरपालिका निवडणुकीच्या काही दिवस आधी त्यांनी युतीची घोषणा केली.
त्यामुळे प्रचारासाठी म्हणावा तेवढा वेळ मिळाला नाही. जर जुलै किंवा ऑगस्टमध्ये युतीची घोषणा झाली असती, तर संपूर्ण मुंबईतील मतदारसंघ पिंजून काढता आले असते.
२) महायुतीचे निवडणुकीतील मायक्रो मॅनेजमेंट
भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष ठाकरे बंधूंच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेत होते. पण ज्या प्रकारचे मायक्रो मॅनेजमेंट भाजप आणि शिवसेनेने केले, तशा प्रकारची कोणतीही प्रचार यंत्रणा शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडे पाहायला मिळाली नाही. बूथ लेव्हलपर्यंत कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क यामुळे महायुतीला या निवडणुकीमध्ये यश मिळाले.
३) काँग्रेसची आघाडी तुटणे
काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट हे लोकसभा आणि विधानसभेत आघाडीत एकत्र होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत केलेल्या युतीमुळे काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी आघाडी तोडली आणि स्वतंत्र निवडणुका लढवल्या. आकडेवारीचा विचार केला,
तर अनेक ठिकाणी काँग्रेस आणि ठाकरे बंधूंच्या पक्षांना जवळपास सारखेच मतदान मिळाले. जर काँग्रेससोबत आघाडी तुटली नसती, तर शिवसेनेच्या किमान २० जागा वाढल्या असत्या, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
४) फक्त मुंबई महानगरपालिकेवरच लक्ष केंद्रित करणे
ठाकरे बंधूंनी फक्त मुंबई महानगरपालिका आणि मुंबईतील इतर महानगरपालिकांवरच लक्ष केंद्रित केले. उर्वरित महाराष्ट्रात त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. फक्त नाशिक येथे एक सभा ठाकरे बंधूंनी घेतली. याउलट भारतीय जनता पार्टीने सभांचा धडाका लावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३७ सभा, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ३५ सभा, एकनाथराव शिंदे यांनी २९ सभा,
अजित पवार यांनी २५ सभा घेतल्या. काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी २९ सभा घेतल्या, तर ठाकरे बंधूंनी फक्त तीन सभा घेतल्या. त्यामुळे मुंबईतील सर्व वॉर्डांमध्ये पोहोचणे शक्य झाले नाही.
५) एआयएमआयएमकडे मुस्लिम मतदार वळणे?
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये एआयएमआयएमला अभूतपूर्व यश मिळाले. या पक्षाला शंभरपेक्षा अधिक जागा मिळाल्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जो मुस्लिम मतदार आघाडीच्या बाजूने गेला होता, तो या वेळी मोठ्या प्रमाणावर एआयएमआयएमकडे वळल्याचे पाहायला मिळाले. याचाही फटका ठाकरे बंधूंना बसला.
वरील सर्व बाबींचा विचार केला, तर ठाकरे बंधूंनी एकत्रित निवडणूक लढवून फारसा फायदा झाल्याचे दिसून आले नाही. अजूनही अनेक कारणे आहेत, ज्यामुळे ठाकरे गटाला अपयश आले. दुसरीकडे एकनाथराव शिंदे यांनी मात्र खरी शिवसेना आपलीच असल्याचे सिद्ध करून दाखविले, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे.







