धर्मेंद्र प्रधानांचा राहुल गांधींवर पलटवार; ‘विद्यार्थ्यांचा वापर राजकारणासाठी’, एक्स पोस्टमधून गंभीर आरोप
नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीत राजकीय वातावरण तापले; राहुल गांधींच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांची एक्स पोस्ट चर्चेत

Dharmendra Pradhan on Rahul Gandhi
दिल्लीमधील जंतर-मंतर येथे सुरू असलेले आंदोलन आणि काल राहुल गांधी यांनी
पंतप्रधान निवासस्थानासमोरील रस्त्यावर केलेल्या आंदोलनामुळे सध्या
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. अशातच धर्मेंद्र प्रधान
यांनी राहुल गांधींना उद्देशून एक एक्स पोस्ट केली असून, त्यामध्ये
त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

राहुल गांधी यांच्या या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक्स पोस्टद्वारे राहुल गांधी यांच्यावर टीका केली
आहे. हे आंदोलन विद्यार्थ्यांचे नसून राजकीय झाल्याचा आरोपही धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे.
केंद्र सरकार नीट पेपरफुटी प्रकरण, त्याची चौकशी आणि संबंधित विषयांवर चर्चा करण्यास तयार आहे.
मात्र, विरोधी पक्षाला चर्चा करायची नसून केवळ राजकीय स्टंट करायचा आहे, असा आरोपही भारतीय जनता पक्षाने केला आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर सोनम वांगचुक यांनी केलेले उपोषण, त्यांना पोलिसांनी रुग्णालयात नेऊन दाखल करणे
आणि त्यानंतर झालेला लाठीहल्ला यामुळे सध्या दिल्लीतील वातावरण चांगलेच तापले आहे.
संपूर्ण विरोधी पक्ष एकत्र येऊन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहे.
मात्र, सरकारने अद्यापही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलेला नाही. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चिघळत आहे.
यातच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक एक्स पोस्ट केली.
राहुल गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात
पंतप्रधान निवासस्थानाजवळ काल राहुल गांधी यांनी ठिय्या आंदोलन केले.
यामध्ये त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
या मागणीसाठी त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. मात्र, संध्याकाळी पोलिसांनी राहुल गांधी,
अखिलेश यादव आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
याप्रसंगी राहुल गांधी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यामध्ये राहुल गांधी
यांच्या नाकाला मार लागल्याचा दावा करण्यात आला असून, त्याचा
व्हिडिओ काँग्रेस पक्षाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हटले आहे?
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची पोस्ट लिंक
https://x.com/i/status/2079617783613313136
विरोधी पक्षनेते श्री @RahulGandhi आणि @INCIndia हे संसदेच्या पावसाळी
अधिवेशनादरम्यान गोंधळ निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांचा राजकीय साधन म्हणून निर्लज्जपणे वापर करत आहेत.
श्री @RahulGandhi आणि @INCIndia यांनी स्थापित सुरक्षा नियमांकडे
दुर्लक्ष करून माननीय पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन
करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे जनतेला गैरसोय झाली.
हेही वाचा-जेवणानंतर लगेच फळे खाणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या योग्य वेळ, फायदे आणि संभाव्य दुष्परिणाम
सरकारने सर्वसमावेशक चर्चेसाठी आपली तयारी दर्शवल्यानंतरही
काँग्रेसने लोकशाही चर्चेऐवजी राजकीय तमाशा निवडला. विद्यार्थ्यांच्या
समस्यांवर तोडगा काढणे हा त्यांचा उद्देश कधीच नव्हता, तर राजकीय मथळ्यांसाठी व्यत्यय आणणे हा होता.
हेही वाचा-Salman Khan Viral Video: थकलेले डोळे, बारीक शरीरयष्टी; सलमान खानला झालं तरी काय? चाहत्यांमध्ये चिंता
राहुल गांधींसाठी हा विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही. चर्चेसाठी सर्व योग्य मार्ग खुले झाल्यानंतरही संघर्ष निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.
आमचे सरकार नीटवर चर्चा करण्यासाठी आणि सभागृहात आमच्या तरुणांच्या प्रत्येक खऱ्या चिंतेचे निराकरण
करण्यासाठी १०० टक्के कटिबद्ध आहे. भारतातील विद्यार्थी राजकीय
प्रचारात केवळ साधन म्हणून वापरले जाण्यापेक्षा अधिक चांगल्या वागणुकीस पात्र आहेत.
त्यांना गोंधळाऐवजी निश्चितता, घोषणाबाजीऐवजी उपाय आणि व्यत्ययाऐवजी जबाबदारी मिळायला हवी.
आपल्या विद्यार्थ्यांना केवळ संताप व्यक्त करण्यापेक्षा अधिक काहीतरी देणे आवश्यक आहे.
त्यांना उत्तरे, सुधारणा आणि उत्तरदायित्व देणे आवश्यक आहे. आणि नेमके हेच देण्यास आमचे सरकार कटिबद्ध आहे.
नीट पेपरफुटी प्रकरण, त्यानंतर झालेली नीट परीक्षा आणि लागलेला निकाल हे सर्व होऊन गेले आहे.
मात्र, सध्या याच परीक्षेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास भारतीय जनता पक्ष तयार नसल्याने हा संघर्ष किती वाढतो, हे पाहावे लागेल.







